सुभाषचंद्र बोस म्हणजे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील तेजस्वी सूर्य! या सूर्याच्या तेजाने इंग्रजांना पोळले, जाळले आणि त्यांच्या साम्राज्याला खिळखिळे केले. युरोपमध्ये उफाळून आलेल्या दुसर्या महायुध्दाच्या रुपाने भारताच्या स्वाभाविक आकांक्षेला साकार रूप देण्यासाठी, आपल्या स्वातंत्र्य प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त करून देण्यासाठी सुभाषबाबूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांनी केलेले कार्य निर्णायक ठरले, अशी इतिहासाची साक्ष आहे. सुभाषबाबूंच्या आयुष्यातील महत्वपूर्ण घटनांची गुंफण करत, छोट्या छोट्या परिच्छेदातून हे चरित्र वाचकांपुढे उलगडत जाते. अखेरपर्यंत वेधकता कायम ठेवणारी, प्रसंगानुरूप रूप घेणारी वाळिंब्यांची शैली वाचकांना बांधून ठेवते. सुभाषबाबूंसारख्या अलौकिक, निग्रही आणि निर्धारी उत्तुंग व्यक्तिमत्वाची ओळख आजच्या पिढीला करून देण्याची नितांत आवश्यकता आहे. वि. स. वाळिंबे यांनी आपल्या ओघवत्या आणि चित्रदर्शी निवेदन शैलीने शब्दबध्द केलेली चरितकहाणी.